Internetबिंटरनेट

 आजकाल आपला मोबाईल हातात घेतला की खूप कम्माल काहीतरी करतोय असं वाटायला लागतं. आता याला कारण काय असावं? एक तर त्यावर अखंड काहीतरी घडत असतं आणि त्यासाठी आपण स्वतः काही करावं लागतंच असं काही नाही ....हं smartphone नावाचं एक वेड विकत मात्र घ्यावं लागतं. या smartphoneवर अनंत apps असतात ज्यांना सतत update व्हायचं असतं. तुम्हाला त्यांना करायचं असो अथवा नसो ते सतत त्याचा पिच्छा पुरवतात.
google आणि apple चं म्हणणं आहे की तू काहीच लक्षात ठेऊ नकोस किंवा कुठे विशेष लक्षही देऊ नकोस ...ना चढता-उतरताना पायऱ्या मोज.. ना गाडीत पेट्रोल आहे का खात्री कर....ना एखादं तोंडी गणित कर ना एखाद्या रस्त्यात स्वतःहून वळ...ना तुझ्या भावंडांचा जन्मदिवस लक्षात ठेव... ना दुसऱ्या दिवशीच्या flight ची वेळ लक्षात ठेव..... बर मग करू काय....? ही सगळी माहिती तुला वेळोवेळी देणारं फक्त एक smart device तुझ्या जवळपास बाळग ...कुठेही ....कसंही .... त्या device शिवाय तुझं सध्या काही चालूच शकत नाही...आणि त्यात असणारं इंटरनेट न त्याची range ह्या दोन गोष्टी पाणी आणि हवा नसेल तरीही चालू असल्याच पाहिजेत हे ध्यानात ठेव....तर असा हा आपला ब्रह्मदेव... कपिला गाय ..कल्पवृक्ष.. द्रौपदीची थाळी  यातल्या कोणालाही ease मध्ये मात देऊ शकेल असा...(वरीलपैकी कोणाविषयी माहिती नसेल तर google करा ;-))
 google, apple सारखी मंडळी कमी होती की काय म्हणून भरीत भर आहे facebookची ज्यावर आपले हवेहवेसे नकोनकोसे सगळ्या प्रकारचे मित्रवर्य आपली आठवण काढून काढून थकलेले असतात. बरं वारंवार समोर येणारं notification कधी असं डावलतात का? पहावच लागतं त्यांच्या आयुष्यात काय काय चाललंय ते!! मित्राने अमेरिकेत बनवलेले बटाटेवडे ..पुरणपोळ्या .....पाहावेच लागतात.. उगीचच feeling फ्रेश म्हणत change केलेला profile pic... कुणाचा नव्या movie चा review... कुणाचं नुकतंच आलेलं परीक्षेचं वेळापत्रक.. कोणाचा तरी सरकारच्या कामावर आक्षेप... तर कोणाचा नवाकोरा चष्मा...काय वाट्टेल ते असतं हं इथे ..आता कोणाला कधी काय share करावसं वाटेल काय अंदाज करणार .....बघावंच लागतं ..करता काय!! comment द्यायची आहे? ...द्या...दिलेली delete करायची आहे? उससे बेहतर!! नुसता चोंबडेपणा करायचाय? no probs! थोडक्यात काय? समोर आल्यावर जे काही सहसा करण्यासाठी खूप विचार करावा लागतो तसं काहीही न करता आरामात हे सगळं करा आणि अगदी निवांत!!
यातून कोणी वाचलंच तर ते बरोब्बर whats app वर असतं...तिथे तर मेंदूची रोजच्या रोज परीक्षा असते ....एका ग्रुपवर ...पहिला मेसेज शास्त्रीय संगीत.. मग दिलीप कुमारने सांगितलेल्या आठवणी...मग सीताफळाचे फायदे तोटे ..मग सेल्फी घेणारा गणपती...मग कोणाची तरी भाजणी विकण्याची advertisement. दुसरा ग्रुप ...संत-बंता विनोद, कोणीतरी शीघ्रकवी स्वतःच्या कवितांचा मारा करतोय ..मग नुसत्या स्मायली.. (हो त्यांना पण अर्थ असतो..अतोनात कष्ट घेउन कोणीतरी विकिपीडियावरून त्यांचे अर्थ शोधून त्यातून निष्कर्ष काढत असत)...कोणी नवीन कट्यार चा प्रोमो ...कोणी नाती या विषयावर वैचारिक....कोणीतरी एक RIP चालू करतं..खरी व्यक्ती आहे नाही पत्ताच नसतो....हुश्श्श!!!
माणसानी करावं तरी काय, हे हे सगळं काही खरोखर वाचत बसायचं नसतं काही ... आणि तुम्हाला काही compulsion नाही की सगळं वाचा..हवं तर घ्या नाहीतर द्या सोडून ..असं म्हणणारे आहेतच की. अहो, हो. पण प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि स्वभाव वेगवेगळे असतात, तर मग सगळे messages सगळ्यांना पाठवले जातात याचा अर्थ काय ?  original आणि copy नक्की कुठली याचा तर शोध न घ्यावा हे उत्तम कारण त्यामुळे पदरी निराशाच अधिक येऊ शकते. असो! कोण कुणाला काय कशासाठी किती कुठे आणि कसं share करत सुटलेलं आहे नेम नाही ...आणि का? याचं कारण काहीही असू शकत ....goodmorning, goodafternoon पासून ते timepass सहज ...पर्यंत. प्रत्येकाला अखंड काहीतरी सांगायचं आहे आणि त्याच्याकडे ते ऐकून घेणारे उपलब्ध आहेत. माहितीचा राक्षस आ वासून समोर उभा आहे. ज्याला त्याच्याशी सामना करता येतोय तो सहज पुढे जातोय दुसरा धडपडतोय...उठतोय ..पुन्हा उभा राहतोय..पण मागे कोणीच फिरत नाहीये. एक माणूस, एक समाज, एक देश नाही तर अख्खं जग यात सामावलेलं आहे आणि प्रत्येकजण येनकेनप्रकारेण जोडलं जाण्याचा प्रयत्न करतोय.
data मग तो कुठलाही असेना; मेसेज, इमेज सारख्या मार्गांनी तो आज जगभर फिरत असताना दिसतोय. तो पाठवणाऱ्याची आणि मिळवणाऱ्याची ही भूमिका आपण अनुभवू शकतोय. त्याचं वेळी इंटरनेटच्या पूर्वीचं विश्व आठवलं. पु ल देशपांड्यांनी रंगवलेलं पौष्टिक जीवन आठवलं. त्यातला आगीचे बंबवाले एकीकडे आग विझवताहेत आणि पोस्टमन इकडे पत्र टाकताहेत हा scene डोळ्यासमोर आला, ज्याला त्या पत्रातल्या संदेशाशी काही घेणं-देणं नाही; पत्रावर नाव, गाव पत्ता  घातलेला आहे, पत्र पाठवलंय, आणि ते इष्टस्थळी पोहोचतय, विषय संपला. या इंटरनेट प्रकरणात मात्र तसलं काही नाही. इथे तुम्ही पाठवलेला एकेक शब्द कित्येक केबल्स मधून प्रवास करत एका टोकावरून दुसरीकडे जातो. कोण तो  keypad, कुठलातरी router, भलताच server सगळे मिळून आपला ‘goodmorning’ इकडून तिकडे पोचवत असतात. बाकी मग ते data साहेब कुठल्याशा केबल्सना कामाला लावतात ज्या आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर समुद्रात राहतात म्हणे. बिचाऱ्यांना काय काय सहन करावं लागत असेल? लाटांचा वेग, शार्कसारखे अक्राळविक्राळ मासे, कधी त्या तुटत असतील तेव्हा काय होत असेल? एखादी केबल हरवूनच गेली तर काय होत असेल? किंवा त्यावर समुद्री वनस्पती उगवल्या तर ? आणि असं काही होऊ नये म्हणून कुठल्याशा कंपन्या काय नि कशी service provide करत असतील कुणास ठाऊक??

आपल्या प्रत्येकाची मोबाईल ही गरज बनलीये. त्यात  इंटरनेट आलच हे सांगायला काही शास्त्रज्ञाची गरज नाही. आज त्यावर ३ सेकंद range गेली की माणूस सैरभैर होतोय आणि या सगळ्या सावळ्यागोंधळात आपण technology ला गृहीत धरून बसलोय. आता ही technology net neutral राहिली म्हणजे मिळवलं :o  

                                               युवोन्मेष २०१५

टिप्पण्या