(इनोव्हेशन) नाविन्य भाग ४

           क्रीडाक्षेत्रातील नाविन्य


Image credits - Daily Star 
इनोव्हेशन अर्थात नाविन्य ही या काळाची अशी गरज आहे जिला कुठल्याही क्षेत्राचं वावडं नाही. प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेली स्पर्धा नाविन्याला प्राधन्य देत आहे. हल्ली एखाद्याला ‘तू कुठला खेळ खेळतोस?’ असं विचारलं तर उत्तरं मिळतात पोकेमोन, कँडी क्रश, बबल शूटर यासारखी मोबाईल गेम्सची यादी. पूर्वी मात्र लहान मुले घराजवळ खाली खेळत असत. रस्त्यात पडलेली एखादी गोटी दिसे, ठिकरी पाणी खेळाचे चौकोन आखलेले असत. हळूहळू या खेळांची जागा क्रिकेटच्या किटने घेतली. खऱ्या खेळातील नियम पाळता येतील इतकी जागा नसे, मग समोरच्या काकूंच्या बाल्कनीला बॉल लागला की २ रन्स, त्यांच्या वर राहणाऱ्याच्या घराच्या आत बॉल गेला की ४ रन्स असल्या गमती चालू झाल्या. या खेळानी लहानथोरांना अक्षरशः वेड लावलं जेव्हा घराघरांत टेलीव्हिजनचं आगमन झालं.
तंत्रज्ञानाचा क्रीडाक्षेत्रात शिरकाव झाला आणि खेळाडूच नव्हे तर प्रेक्षकाचंही जग बदलून गेलं. क्रिकेट या खेळाशी संबंधित अशीच एक गमतीशीर गोष्ट; १९९२मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात सर्वात प्रथम ‘थर्ड अम्पायर’ नियोजित केला गेला आणि त्याच्या पहिल्यावहिल्या निर्णयामुळे सचिन तेंडूलकर या भारतीय खेळाडूला धावबाद व्हावं लागलं. पुढच्या काळात रिप्ले तंत्रज्ञानामुळे कित्येक मित्रांमधली “अर्रर...नाही यार नव्हता आउट” असली भांडणं सोडवली असतील. कोनमापक वापरून कितीक जण कोणता खेळाडू अधिक  अंशाने बॉल वळवतो यावर चर्चा करीत असतील किंवा त्यातून शिकत असतील. येत्या काही वर्षात स्नीकोमीटर हे पीचमध्ये बसवले गेलेले सेन्सर निर्णय देण्यासाठी वापरले जातील ज्यात आजूबाजूचे आवाज वगळले जाऊन केवळ बॅट आणि बॉल मुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचे तरंग पकडले जातील.  फुटबॉलच्या सामन्यात जी गोल लाईन टेक्नोलॉजी वापरली गेली त्यामुळेही गोल पोस्टजवळची रेषा जी पूर्वी दिसत नसे ती टेलीव्हिजनच्या सहाय्याने दिसू लागली व त्यामुळे खेळाचा निर्णय बिनचूक सांगता येऊ लागला. प्रेक्षकांना देखील त्याचा आस्वाद घ्यायला मदत होऊ लागली.
ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशभक्ती व खेळाडूंची किमया ही जितकी महत्वाची तितकं अचूक निर्णय देणारं तंत्र महत्वाचं ठरतंय. खेळात सहभागी होण्यापूर्वी प्रशिक्षण घेताना या तंत्राचा वापर करून खेळाडू स्वतःच्या शारिरीक क्षमतेत योग्य ते बदल करू शकतोय. सायकलिंग किंवा रोइंगच्या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू सराव करताना त्यांच्या पायावर विविध सेन्सर लावतात व सायकल चालवताना होणारा पायांचा कोन, त्यातील अंतर, वापरली जाणारी शक्ती हे सर्व विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. स्पर्धेचे निकष ठरवताना व निर्णय करतानाही तांत्रिक सुविधा वापरल्या जाताहेत; धावण्याच्या शर्यतीसाठी प्रत्येक धावपटूने  एकाच वेळी शर्यत सुरु करावी किंबहुना ध्वनीलहरी एकाच वेळी ऐकू जाव्या यासाठी दर धावपटूसाठी एक स्पीकर बसवला जातोय.  ‘मिलीसेकंद’ मोजलं जातंय. तायक्वांदो खेळात खेळाडूच्या मोज्यांवर, शरीरावर सेन्सर बसवले जात आहेत  ज्यामुळे खराखुरा आघात मोजला जाऊ शकतो.

या इनोव्हेटीव जगात आपण आपलं तांत्रिक ज्ञान वाढवत चाललो आहोत हे खरं पण आपलं पटांगण आपण विसरत चाललो नाहीयोत नं, हेही थोडं विचार करण्यासारखं आहे बरं का! पूर्वी आई खाली खेळायला गेलेल्या मुलांना संध्याकाळी हाक मारून दमत होती, आता मात्र “अरे, किती वेळ त्या मोबाईलवर खेळशील? खाली खेळून ये जरा!” असं सांगू लागली आहे. या लहान स्क्रीनवरचे खेळ आपला तात्पुरता आत्मविश्वास वाढवू शकतील पण खऱ्याखुऱ्या पटांगणात multiplayer खेळ खेळलो तर hint वगैरे उपलब्ध नसतानाही खेळता  येऊ शकतं हे आपल्याला कळेल. असं आपण केलं तर काय माहित; कदाचित लगोरी किंवा डबडा ऐसपैस सारख्या खेळांची नवी नवी versions बघायला मिळतील आणि शारीरिक क्षमता जोपासण्याचा खेळ तर आपण जिंकलेलोच असू.
जानेवारी   २०१७ शिक्षणविवेक

टिप्पण्या